सोलापूरच्या लक्ष्मी-विष्णू मिल गिरणी कामगारांच्या हक्कासाठी पुण्यात धडक; ह्यूमन राईट्स असोसिएशनकडे तक्रार दाखल.

पुणे खबर
आकुर्डी, (पुणे) १८ नोव्हेंबर २०२५
सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी-विष्णू गिरणीचे जुन्या कामगार गेल्या २५-३० वर्षांपासून प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी आणि गिरणीच्या जागेवर कामगारांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेच्या रखडलेल्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. हा लढा आता पुण्यापर्यंत पोहोचला असून, कामगारांनी थेट ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मुख्य कार्यालयात (आकुर्डी, पुणे) धडक देत आपली व्यथा मांडली.कामगारांचे म्हणणे आहे की, सोलापूर महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या गिरणीच्या जागेवर कामगारांसाठी घरकुल बांधण्याबाबत अनेक वर्षांपूर्वी ठरावही झाले होते. मात्र आजतागायत त्यांची ही घरकुल योजना प्रत्यक्षात आलेली नाही. तसेच प्रॉव्हिडंट फंड आणि इतर देयकेही रखडली आहेत. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी संघटित होऊन पुण्यात येऊन ह्यूमन राईट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमोर आपल्या तक्रारीचा सविस्तर पाढा वाचला.तक्रारींची गंभीर दखल घेत ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे पदाधिकारी पुढील कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले.

या वेळी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रघुनाथ रोकडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रजाक शेख, सचिन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे खबर प्रतिनिधी शी तक्रारकर्त्या नी बोलताना म्हणाले की, “आम्ही गेल्या अनेक दशकांपासून न्याय मागत आहोत. आता ह्यूमन राईट्स असोसिएशन ने पुढाकार घेतल्याने आम्हाला आशा आहे की लवकरच आमचे हक्क मिळतील.”या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी पुन्हा एकदा एकजूट दाखवली असून, पुढील टप्प्यात राज्य मानवाधिकार आयोग आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडे ही पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती एम डी चौधरी यांनी दिली.




