धाड गावात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी.

पुणे खबर
१५ ऑगस्ट २०२५
धाड (ता. जि. बुलढाणा) – जवळपास २० हजार लोकसंख्या असलेल्या धाड गावात आधार केंद्र नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आधार कार्ड काढणे, दुरुस्ती किंवा अद्ययावत करण्यासाठी येथील रहिवाशांना दुसऱ्या गावात जावे लागते. जाण्या-येण्यासाठी पुरेशा वाहनांची सोय नसल्याने विशेषतः वयोवृद्ध नागरिक, लहान मुले, गरोदर महिला व शालेय विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

धाड हे व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे गाव असून येथे आधार केंद्र सुरू झाल्यास सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन बुलढाणा यांच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष इक्बाल सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख, मोबीन शेख, अबुजर मिर्झा, अली नवाज, फारुख, आबिद खान, जुनेद शेख, समीर शेख आदी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने धाड गावात आधार केंद्र सुरू करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली.





