पूरग्रस्तांसाठी साथी सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात.

पुणे खबर
दि. ४ ऑक्टोबर २०२५
(देहूरोड पुणे) : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांची पिके, घरे, दुकाने आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. निवाऱ्याचे, अन्नधान्याचे आणि आरोग्यसेवेचे संकट अधिकच गंभीर बनले आहे.
या पार्श्वभूमीवर साथी सोशल फाउंडेशन (देहूरोड)ने पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. “महाराष्ट्राची परंपरा ही संकटकाळात एकदिलाने उभे राहण्याची आहे. आज पुन्हा एकदा ती परंपरा जपण्याची वेळ आली आहे,” असे फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी करिम तांबोळी यांनी सांगितले.

फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच कुबा मस्जिद साईनगर, मस्जिद एक अक्सा विकास नगर आणि महाराष्ट्र हॉटेल सोमाटणे फाटा यांच्या सहकार्याने तांदूळ, पीठ, डाळी, मुरमुरे, बेसन, मीठ, साखर, साबण यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे ९० किट्स सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना देहूरोड येथून रवाना करण्यात आले.
या उपक्रमामुळे पूरग्रस्तांच्या डोळ्यांत आशेचा किरण निर्माण झाला असून त्यांच्या आयुष्याला नव्याने उमेद मिळाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
अशी माहिती साथी सोशल फाउंडेशन (देहूरोड) अध्यक्ष हाजी करिम तांबोळी यांनी पुणे खबर वृत्तवाहिनीला दिली.



